जळगाव, 7 ऑगस्ट: युवकांमधील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी जिल्ह्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येत असून, शाळा-महाविद्यालयांपासून गाव-वॉर्ड पातळीपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी ‘माय भारत क्लब’, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग तसेच सामाजिक व आध्यात्मिक संस्थांनी सहभागी होऊन सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
‘नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियान –
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या ‘नशामुक्त युवा विकसित भारत’ या राष्ट्रव्यापी अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करीष्मा नायर, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे आदींसह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ‘प्रोटेक्ट, प्रिव्हेंट, रिकव्हर’ या त्रिसूत्रीवर भर देण्यात येणार आहे. पालक संवाद, समुपदेशन, डिजिटल डिटॉक्स, करिअर मार्गदर्शन, क्रीडा, योग, पारंपरिक खेळ, वाचन चळवळ, कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन आदी उपक्रमांद्वारे युवकांना सकारात्मक पर्याय उपलब्ध करून दिले जातील.
दर महिन्याला चार रविवार विविध उपक्रमांसाठी निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या रविवारी तज्ज्ञ मार्गदर्शन व जीवनकौशल्य प्रशिक्षण, दुसऱ्या रविवारी क्रीडा, योग, सायकल रॅली, ट्रेकिंग व सांस्कृतिक कार्यक्रम, तिसऱ्या रविवारी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, रक्तदान व सामाजिक उपक्रम, तर चौथ्या रविवारी युवक महोत्सव, स्पर्धा, पुरस्कार व कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व गावांपर्यंत हे अभियान पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, प्रत्येक गावात ‘माय भारत युवा क्लब’ स्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे. व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या किंवा धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या युवकांना कौशल्य विकास, रोजगार, समुपदेशन व पुनर्वसनाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणले जाईल.
जळगाव जिल्ह्यातील अमली पदार्थविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. संशयित बंद कारखाने, कुरिअर व टपाल व्यवस्था, प्रवासी बस तसेच इतर ठिकाणी तपासणी केली जात असून, अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शेवटपर्यंत माग काढण्यावर पोलिसांचा भर आहे. ‘मिशन राईज’ उपक्रमातून शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्पपरिणामांबाबत जनजागृती केली जाणार आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी करावयाच्या आवश्यक कृतीचे सादरीकरण जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी केले.






