मुंबई, 12 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता बी.ई./बी.टेक तसेच एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज मागविण्यात आले होते. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक ११ जुलै २०२५ होती. आता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही १४ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल दिली.
काही उमेदवार, पालक तसेच शैक्षणिक संस्थांनी वैयक्तिक भेटीद्वारे, ई-मेल तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, नोंदणीसाठी काही दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या भवितव्यास प्राधान्य देऊन बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. तसेच ही मुदतवाढ अंतिम असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व उमेदवार, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी अर्जाची पडताळणी करून घ्यावी –
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.
मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज पडताळणी प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. यानंतर संबंधित अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांनी यादीतील स्वतःची माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी. तसेच, यादीत काही त्रुटी आढळल्यास तक्रार निवारणासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पडताळणी (E-Scrutiny Centre) चा पर्याय निवडलेला आहे, त्यांनी आपली हरकती संबंधित दस्तऐवजासह स्वतःच्या लॉगिनद्वारे नोंदवाव्यात.
त्यानंतर उमेदवाराचा अर्ज सुधारणा करण्यासाठी “अनलॉक” करण्यात येईल. उमेदवाराने आवश्यक दस्तऐवज अपलोड करून अर्ज संपादित (Edit) करून पुन्हा सादर (Submit) करावा. ज्या उमेदवारांनी प्रत्यक्ष पडताळणी केंद्राचा (Scrutiny Centre) पर्याय निवडला आहे, त्यांनी आवश्यक हरकती असल्यास मूळ प्रमाणपत्रांसह केंद्रावर जाऊन आपली त्रुटी दूर करावी.
वैध हरकती, दावे व त्रुटी यांचा विचार अंतिम गुणवत्ता यादीत (Final Merit List) घेण्यात येईल, अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही हरकतीचा स्वीकार केला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया अचूक पूर्ण करावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांत दादा यांनी केले आहे.