जळगाव : जळगाव जिल्ह्यात आज सकाळी एक अत्यंत हादरवणारी घटना घडली. शिंदे गटाचे माजी उपसरपंच असलेले युवराज कोळी यांच्या हत्येच्या घटनेनंतर जळगावात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हत्येच्या या घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मृत युवराज कोळी यांच्या कुटुबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच माध्यमांशी बोलताना या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले पालकमंत्री गुलाबराव पाटील –
माध्यमांशी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगावच्या कानसवाडा गावाजवळ हा प्रकार घडला. सकाळी 8 वाजता युवराज कोळी हा शेतात जात असताना काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यात त्याचा जीव गेलेला आहे. त्याचे शव याठिकाणी आणलेले आहे त्याचा पंचनामा किंवा शवविच्छेदन याठिकाणी केलं जात आहे.
View this post on Instagram
जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाईकांची मागणी आहे. पण आम्ही त्यांना विनंती केली, शवविच्छेदन ही प्रक्रिया पूर्ण करा. आताच एसपींसोबत माझं बोलणं झालं आहे. एलसीबीचं पथक आणि आणखी दोन पोलीस पथक आरोपींच्या शोधात आहे आणि दोन तासात त्यांना अटक होईल. हा वाद शेतावरुन होता की आणखी कोणत्या कारणातून ही हत्या झाली, हे पोलीस तपासातून समोर येणार आहे, असेही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
काय आहे नेमकी घटना –
जळगाव तालुक्यातील कानसवाडे परिसरात ही घटना घडली. युवराज सोपान कोळी (वय-35) असे हत्या झालेल्या माजी उपसंरपचाचे नाव आहे. युवराज कोळी हे कानसवाडे येथे शिंदे गटाचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते.आई-वडील, पत्नी आणि मुलांसह ते वास्तव्यास होते. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे.
दरम्यान, गुरूवारी रात्री गावातील काही जणांशी त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याच वादातून शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्यावर तिघांकडून धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. यावेळी युवराज कोळी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना पाहताच आजुबाजुचे ग्रामस्थ धावत आले. मात्र, तोपर्यंत हल्लेखार घटनास्थळावरून पसार झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोळी यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले.
भरत पाटील, देवा पाटील, महेश पाटील अशी खून करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तीन आरोपींना युवराज कोळी यांच्यावर वार करुन त्यांची हत्या केली. त्यापैकी भरत पाटील याला अटक झाली आहे, अशी माहिती जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
हेही वाचा – Jalgaon Murder : जळगावात शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाचा खून, पोलीस अधीक्षकांनी दिली महत्त्वाची अपडेट