जळगाव, 14 जून : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बहुतांश ठिकाणी पंचनामे करण्यात आले असून उरर्वित पंचानामे देखील लवकरात लवकर केले जातील आणि त्यांनंतर नियमानुसार मदत शेतकऱ्यांना तात्काळ दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत मदत मिळण्यासाठी मी स्वतः लक्ष घातले असून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.
मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आढावा –
जळगाव जिल्ह्यात बुधवार 11 जून रोजी रात्री झालेल्या वादळी पावसमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात केळी, मोसंबी, पपई तसेच लिंबू बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात आल्यानंतर नुकसानीबाबतचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली.
गिरीश महाजन काय म्हणाले?-
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात परवाच्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अगदी चक्रीवादळासारखा हा पाऊस होता. यामुळे केळी, मोसंबी तसेच लिंबूच्या बागा ह्या मुळापासून निघाल्या आहेत. तर काही ठिकाणी शेकडो घरांची पत्रे उडाली आहेत. वीजेचे पोल तसेच तारांचे देखील वादळामुळे नुकसान झालंय. यासंदर्भात प्रशासनाकडून आढावा घेतलाय.
जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच तहसिलदार यांनी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचानामा केलाय. आता नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. जळगाव जिल्ह्यात वादळी पावसात तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या नातेवाईकांना देखील नियमानुसार मदत दिली जाईल, असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
विमान अपघाताताबाबत काय म्हणाले? –
अमदाबाद विमान अपघाताबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, विमान अपघाताची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. अहमदाबादहून लंडनला हे विमान निघाले होते. या विमानात सव्वा लाख इंधन भरले होते आणि विमान जमीनदोस्त होऊन मोठा स्फोट त्यावेळी झाला. यामध्ये विमानातील प्रवाशी तसेच मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील 270 जणांना आपला जीव गमावावा लागलाय. खरंतर, कुठल्या शब्दात संवेदना व्यक्त कराव्यात हे कळत नाही. पण दुर्दैवाने ते आपल्यात नसून त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करतो. दरम्यान, विरोधकांना कुठल्याही गोष्टीचे गांभीर्य नसल्याने ते सरकारविरोधात वक्तव्य करत असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.