मुंबई, 4 जून : गिरीश महाजन हे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री असून त्यांच्या कार्यालयात 350 फाईल पडलेल्या असल्याचा दावा करत गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्री असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी केला. दरम्यान, राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनात 350 फाईल पेंडिग असल्याचा आरोप केला आहे. मात्र, मंत्री पदाचा पदभार हाती घेतल्यानंतर माझ्या कार्यालयात 209 फाईल आलेल्या होत्या. त्यापैकी 193 फाईलचा निपटारा केलाय. आता 16 फाईल सध्यास्थितीत आहेत. त्यापैकी 13-14 फाईल ह्या दोन चार दिवसात आल्या आहेत. दरम्यान, राऊतांवर कोणी काही बोलले तर ते बेछूट आरोप करतात आणि सनसनाटी निर्माण करतात, असा टोला मंत्री महाजन यांनी लगावला.
View this post on Instagram
माझ्याकडे कोणतीच फाईल पेंडिंग नाही –
मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, अभिषेक कौल हे जळगावचे आहेत हे मला माहित आहेत. मागच्या काळात मंत्री असताना ते आस्थापनेवर होते की नव्हते हे मला माहित नाही. कौल माझ्याकडे आले होते. मात्र, मी शासकीय स्टाफ घेतल्याचे त्यांना सांगितले होते. यामुळे माझ्याकडे कोणतीच फाईल पेंडिंग नाहीये. दरम्यान, खोटं बोलून बेछूट आरोप करायचे काम राऊत करत असल्याचे मंत्री महाजन म्हणाले.
संजय राऊत हे नैराश्यातून बोलतात –
संजय राऊत हे नैराश्यातून बोलत आहेत. उद्धव ठाकरेंनी सांगाव की, राऊत हे संघटन करायला जातात पण ते पक्षाचे विघटन करून जातात. संजय राऊत यांच्यावर आता कोणाचा विश्वास नाहीये. संजय राऊतांचे कुठले कर्तुत्व आहे, त्यांचे सामाजिक कार्य काय, असा सवाल उपस्थित करत इतरांवर आरोप करत असताना त्यांनी आपण काय आहोत, हे देखील राऊतांनी सांगितले पाहिजे, असेही मंत्री महाजन म्हणाले.