मुंबई, 19 जानेवारी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विनायक नंदकुमार पाटील राज्याभरातून पहिला आला आहे. तो आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय गटातील (ईडब्ल्यूएस) आहे. तर मुलींमध्ये पूजा वंजारी हिने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. मागासवर्गीयांतून धनंजय बांगर हा राज्यात पहिला आला आहे. विशेष म्हणजे, राज्यसेवेच्या 600 पदांसाठी गुरूवारी दुपारी मुलाखती घेण्यात आल्या आणि संध्याकाळी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली.
विनायक पाटील राज्यातून पहिला –
विनायक पाटील हा 622 मार्क मिळून पहिला तर 570.25 गुणांसह पुजा वंजारी मुलींमध्ये पहिली आली आहे. तर मागसवर्गीयातून दुसरा आलेला धनंजय बांगरला 608 गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर गुणवत्ता यादी पाहता येईल. राज्यभरातू 1,830 उमेदवारांचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात आला आहे. सौरभ गावंडे, गणेश दिघे, शुभम पाटील यांनी गुणवत्ता यादीत अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे.
उमेदवारांकडून पसंतीक्रम मागविण्यात येत आहेत. त्यासाठी उमेदवारांना 22 ते 29 जानेवारी दरम्यान ऑनलाईन पसंतीक्रम भरून द्यायचे आहेत. उमेदवारांची त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार निवड करण्यात येईल. ही गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर गुणवत्ताक्रमात बदल होऊ शकतो, असेही आयोगाने कळविले आहे.
हेही वाचा : आमदार रोहित पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भाजपच्या चिन्हावर…