मुंबई, 16 एप्रिल : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी काल रात्री राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांनी स्नेहभोजन देखील केले. दरम्यान, या दोघांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आले. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधत त्या भेटीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
राज ठाकरेंसोबत झालेली भेट ही सदिच्छा भेट होती. या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही. सरकारचं काम कसं सुरू आहे. मुंबईतील कामे कशापद्धतीने पार पडत आहे, याबाबत राज ठाकरेंनी विचारणा केली. दरम्यान, या भेटीत राजकीय चर्चा कुठलीच झाली नसून गप्पा गोष्टीत तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देण्यात वेळ कुठे गेला हे आम्हालाच कळले नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विरोधकांना चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही. तसे बघायला गेले तर राज ठाकरे आणि आम्ही काही विरोधक नाहीत. लोकसभेत ते मोदीसाहेबांसोबत अर्थात आमच्यासोबत होते. आमचे विचार मिळते जुळते आहेत. यामुळे विरोधकांना चिंता करण्याचे कारण नाही. त्यांनी काम करावं. खरंतर, घरी बसून निवडणुका जिंकता येत नाही. त्याला फिल्डवर जाऊन काम करावं लागतं लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेता लगावलाय.
View this post on Instagram
राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात भेट –
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी काल रात्री ही भेट झाली. राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास सव्वा ते दीड तास चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
हेही वाचा : पावसाची आनंदवार्ता! भारतीय हवामान खात्यानं सांगितला या वर्षाचा पावसाचा अंदाज, नेमका किती पाऊस पडणार?