जळगाव, 15 एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा-2025 या उपक्रमाचा शुभारंभ नियोजन समितीच्या सभागृह उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद होते. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंधरवड्याचे प्रमुख उद्देश नेमके काय? –
जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा प्रमुख उद्देश महामंडळांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांशी सुसंवाद व तक्रार निवारण, पाण्याचा अपव्यय कमी करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर तसेच पाणी वापराबाबत जनजागृती करणे हा आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येणार असून, पाण्याच्या शाश्वत वापरासाठी जनतेला सहभागी करून घेण्यावर भर देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या भाषणात पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन काळाची गरज असल्याचे सांगून शासकीय यंत्रणांनी नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.
- जलव्यवस्थापन कृती पंधरवडामध्ये राबविण्यात येणारे उपक्रम –
- 15 एप्रिल 2025 – जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 साजरा करणे व जलसंपदा पंधरवडा शुभारंभ.
- 16 एप्रिल – जलसंपदा अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे
- 17 एप्रिल – स्वछ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण (Rain water Harvesting)
- 18 एप्रिल – शेतकरी/पाणी वापर संस्था संवाद
- 19 एप्रिल – भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी
- 20 एप्रिल – कालवा स्वच्छता अभियान
- 21 एप्रिल – उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारींची निरसन करणे
- 22 एप्रिल – अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेऊन कार्यवाही करणे
- 23 एप्रिल – जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत बैठक/कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम
- 24 एप्रिल – सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली, थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा
- 25 एप्रिल – विद्यापीठ/केव्हिके/ सेवाभावी संस्था यांच्या समवेत संवाद व कृती कार्यक्रम
- 26 एप्रिल – महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे
- 27 एप्रिल – आपत्ती व्यवस्थापन करण्यात मार्गदर्शन (पूर/मालमत्तेचे रक्षण)
- 28 एप्रिल – महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे नावे संपादित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेणे/अतिक्रमण निष्कासन दिनांक 31मे पूर्वी करणे
- 29 एप्रिल – पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र/कार्यशाळा
- 30 एप्रिल 2025 – रोजी मा. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा/महिला मेळावा आणि या पंधरवडा कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार व पंधरवडा समारोप
असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती जलसंपदा( विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
हेही वाचा : सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत; सन 2025-2030 साठी तारखा जाहीर; पाचोरा-भडगावची तारीख कधी?