जळगाव, 5 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या आरोप पत्रात वाल्मिक कराडला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, वाल्मिक कराडची धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेल्या जवळीकमुळे मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणी केली जात होती. अशातच त्यांनी काल वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर तीन महिन्यांपुर्वी संधी हुकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांना संधी मिळणार का? याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अनिल पाटलांना संधी मिळणार का? –
अनिल पाटील हे अमळनेर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे ते मोठे नेते मानले जातात. यापुर्वी, पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. यावेळी त्यांनी अजित दादा यांच्यासोबत जाणे पसंत केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट हा महायुती सरकारमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान, हायुती सरकारमध्ये 2023 साली अनिल पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागली होती. यावेळी त्यांना आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाला मोठं यश मिळालं. दरम्यान, महायुती सरकारमध्ये अनिल पाटलांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असताना देखील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आले. दरम्यान, आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अनिल पाटील यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ नेत्यांच्या नावाचीही चर्चा –
संतोष देशमुख हत्याप्रकरण हे धनंजय मुंडे यांना भोवलं असून यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन समीकरणांची चर्चा होत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तर अनिल पाटील, प्रकाश सोळंके आणि संजय बनसोडे यांच्या देखील नावाची चर्चा सुरु आहे. आता राष्ट्रवादीतून नेमकी कोणत्या नेत्याला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : ‘महाराष्ट्रात पोलिसांचा, कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुंडागर्दी वाढलीये’, एकनाथ खडसेंची सरकारवर जोरदार टीका