जळगाव, 19 एप्रिल : ‘एक तालुका एक कृषी उत्पन्न बाजार समिती’ असा निर्णय राज्यातील महायुती सरकारने घेतला असून मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत पणन विभागाच्या वतीने राज्यातील 21 जिल्ह्यांतील 68 तालुक्यांमध्ये नव्या बाजार समित्या सुरू करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात तीन नव्या बाजार समित्यांची निर्मिती होणार असून मुक्ताईनगर, एरंडोल आणि भडगाव अशा तीन ठिकाणी नवीन बाजार समित्या अस्तित्वात येणार आहेत.
एक तालुका एक बाजार समितीची घोषणा –
राज्यात सध्या 305 बाजार समित्या कार्यत असून, या बाजार समित्यांचे 625 उपबाजार कार्यरत आहेत. तर राज्यातील 68 तालुक्यांत बाजार समित्या नव्हत्या. यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पणन विभागामार्फत पुढील 100 दिवस आराखड्यानुसार कृती कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर बाजार समित्या स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अर्थसंकल्पातील भाषणादरम्यानही एक तालुका एक बाजार समितीची घोषणा केली होती. यानुसार आता राज्यात 68 तालुक्यांमध्ये नव्या बाजार समित्या अस्तित्वात येणार आहेत.
तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा –
एक तालुका एक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निर्णयामुळे धरणगाव, बोदवड आणि पाचोरा या बाजार समित्यांचे विभाजन होणार असून जळगाव जिल्ह्यात आता मुक्ताईनगर, एरंडोल आणि भडगाव याठिकाणी बाजार समित्यांची निर्मीती करण्यात येणार आहे. यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता तालुक्यावरच शेतीमाल विक्रीची सुलभ सुविधआ उपलब्ध होणार आहे.