मुंबई, 10 मे : राज्यात यंदा कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना मागील आठ दिवसांपासून राज्यातील विविध भागात ढगाळ वातावरण असून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. अशातच मान्सूनच्या आगमनाची तारीख समोर आली आहे. येत्या 27 मे रोजी केरळच्या समुद्रकिनार पट्टीवर मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार? –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सर्वसाधारणपणे नैऋत्य मान्सून हा 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात दाखल होतो. 17 सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत परतून जातो. मात्र, यंदा मान्सून हा वेळेआधीच दाखल होणार असून येत्या 27 मे रोजी मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आयएमडीनुसार, केरळमध्ये 2009 साली मान्सूनचे 23 मे रोजी आगमन झाले होते. जर अपेक्षेप्रमाणे यंदा मान्सूनचे 27 मे रोजी केरळमध्ये आगमन झाले तर काही वर्षांतली ही दुसरी वेळ असणार आहे. यासोबतच मान्सूनच्या लवकर आगमनामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये मान्सूनबाबत समाधान असणार आहे.
उष्णतेची लाट कमी;अवकाळीचा फटका –
राज्यात मार्च महिन्याच्या मध्यापासून ते मे महिन्याच्या सुरूवातीपर्यंत मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट होती. नागरिकांना कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागला. मात्र, राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाल्याने सध्या उष्णतेची लाट कमी झालीय. यासोबतच पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.