देहरादून, 15 जून : अहमदाबाद विमान अपघाताची घटना ताजी असतानाच केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताची बातमी समोर आली आहे. आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर देहरादूनहून केदारनाथच्या दिशेने निघाले होते. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले. दरम्यान, या भीषण अपघातात हेलिकॉप्टरमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश आहे.
केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात –
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील केदारनाथ धामच्या दर्शनासाठी देहरादून येथून आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर निघाले होते. अशातच गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान हेलिकॉप्टर कोसळले असून यामध्ये एकूण सात जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. यानंतर घटनास्थळी NDRF व SDRF च्या टीमने तात्काळ शोध आणि बचाव कार्य सुरू केले.
सात जणांचा मृत्यू –
केदारनाथ खोऱ्यात दाट धुके तसेच जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर मार्गावरून भरकटले. यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि ते गौरीकुंडच्या जंगलामध्ये कोसळले. या हेलिकॉप्टरच्या दुर्दैवी अपघातात सात जणांचा मृत्यू झालाय. घटनास्थळी बचावकार्य राबविण्यात येत आहे. मात्र, केदारनाथमधील खोऱ्यातील दाट धुके आणि प्रतिकूल हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. असे असताना स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
यवतमाळच्या जैस्वाल दाम्पत्यावर काळाचा घाला –
केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील जैस्वाल दाम्पत्यावर काळाने घाला घातलाय. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी असलेले राजकुमार जैस्वाल त्यांची पत्नी श्रद्धा तसेच त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी हे 12 जून रोजी केदारनाथच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांनी केदारनाथ दर्शनासाठी हेलिकॉप्टर सेवेचा पर्याय निवडला होता. मात्र, ही यात्रा त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरली असून त्यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. दरम्यान, या कुटुंबाच्या निधनाने वणी गावात शोककळा पसरली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश –
केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शोक व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चारधाम यात्रा मार्गावरील सर्व हेलिकॉप्टर सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. हा अपघात उत्तराखंडमधील या महिन्यातील पाचवा हेलिकॉप्टर अपघात आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे केदारनाथ यात्रेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.