ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव हरेश्वर, 24 जुलै: आषाढी एकादशीनिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे भरणार्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी मुख्य मंदिर परिसर, यात्रा मार्ग आणि महत्त्वाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.
आषाढी एकादशीनिमित्त पिंपळगाव हरेश्वर व परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. या गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे, वाहतूक कोंडी होऊ नये आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
”आषाढी एकादशी हा श्रद्धेचा उत्सव आहे. यात्रेदरम्यान भाविकांना कोणताही त्रास होणार नाही आणि शांतता राखली जाईल, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी आणि भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे व कोणत्याही अ अफवांवर विश्वास ठेवू नये.”
— कल्याणी वर्मा (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पिंपळगाव हरेश्वर)
पाहणीदरम्यान एपीआय कल्याणी वर्मा यांनी मंदिर प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि व्यापारी बांधवांशी चर्चा केली. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला:
गर्दीचे नियोजन: भाविकांसाठी रांगेची योग्य व्यवस्था आणि मुख्य प्रवेश व बाहेर पडण्याच्या मार्गांची पाहणी.
वाहतूक व पार्किंग व्यवस्था: यात्रा काळात गावात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली.
सीसीटीव्ही व बंदोबस्त: गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात येणार असून संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाईल.
महिला व बालकांची सुरक्षा: महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथक तैनात ठेवले जाणार आहे.
हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी






