नवी दिल्ली, 24 जुलै: लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर प्रशासनाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर काही महत्त्वाच्या अटींवर मागे घेतले आहे. या निर्णयामुळे आंदोलनाला नवे वळण मिळाले असून, पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारनेही कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे –
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान सरकारतर्फे मान्य करण्यात आलेल्या महत्त्वाच्या मागण्यांची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच, केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेले अधिकृत आश्वासन जे. पी. नड्डा यांनी वांगचुक यांना वाचून दाखवले.
या आश्वासनानुसार केंद्र सरकारने तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार, 20 जुलै रोजी शांततेत आंदोलन करून संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय पेपरफुटीच्या घटनांवर तसेच देशातील परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. तसेच नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत अथवा नुकसानभरपाई देण्याबाबतही सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ संदेश –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात पेपरफुटी हा देशाच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर विषय असल्याचे स्पष्ट करत दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रकरणातील खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
याच पार्श्वभूमीवर CJP चे शिष्टमंडळ आज दुपारी १२.३० वाजता केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहे. या बैठकीत पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
पेपरफुटीचा मुद्दा आज कॅबीनेटमध्ये –
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या कायद्याच्या मसुद्यावर आज (शुक्रवारी) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर हा मसुदा संसदेत मांडून विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या प्रस्तावित कायद्यात दोषींना कठोर शिक्षा आणि अशा गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी विशेष तरतुदी करण्यात येण्याची शक्यता आहे.
सीजेपीचे आंदोलन सुरूच राहणार –
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होईपर्यंत जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिला आहे. सरकारच्या हालचालींनंतरही आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणातील घडामोडींवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
अभिजीत दीपके यांची प्रतिक्रिया –
वांगचूक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, सोनम सर, आपल्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण संपूर्ण देशाच्या विवेकाला जागृत केले. आपले जीवन देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीतर्फे नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले शांततापूर्ण आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत सुरूच राहील. पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीवर आंदोलनकर्ते ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी






