चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
धरणगाव, 20 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दुपारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते धरणगावात विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, धरणगाव येथे उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन व जामनेर तालुक्यातील गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी पाच कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात माजी मंत्री तथा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे हे देखील उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात ते मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार होते, अशा चर्चा यावरून केल्या जात होत्या.
एकनाथ खडसेंनी दिले स्पष्ठीकरण –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर एकनाथ खडसे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी भेट होणार होती या चर्चां खऱ्या नाहीयेत. या कार्यक्रमाच्यानिमित्ताने मी ज्याठिकाणी उपस्थित राहिलो जर औपचारिकरित्या भेट झाली तर भेट घ्यावी, असा माझा प्रयत्न होता.
View this post on Instagram
आता हा शासकीय कार्यक्रम नव्हता. खरंतर, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता. यामुळे या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. दरम्यान, क्रांतीवीर खाज्याजी नाईक यांच्या स्मृतीस्थळाचं लोकार्पण याठिकाणी करण्यात येणार होतं. म्हणून या कार्यक्रमात काही राजकीय चर्चा होईल, याची अपेक्षाच नव्हती, असेही एकनाथ खडसेंनी स्पष्ठ केलंय.
मुख्यमंत्र्यांसोबत भेट न झाल्याने खंत नाही –
दरम्यान, मी संघाच्या कार्यक्रमला आलो होते. यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत भेट न झाल्यामुळे मला कुठलीही खंत वाटत नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच जर मला त्यांची भेट घ्यायची असेल तर मी अशा गर्दीत का त्यांची भेट घ्यावी. मला अपाँइंटमेंट घेऊन शांततेने त्यांच्यासोबत भेट घेऊन विकासाकामांबाबत चर्चाही करता येईल, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
कार्यक्रमात एकनाथ खडसेंना स्टेजवर स्थान नाही –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांना स्टेजवर बसविण्यात आलं नव्हतं. ते व्हीव्हीआयपी सेक्शनमध्ये बसले होते. यावर पत्रकारांनी एकनाथ खडसेंना विचारणा केली असता ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने धरणगावमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलं होतं. यामुळे मी याठिकाणी उपस्थित राहिलो. पण याठिकाणी अपेक्षा नव्हती की सर्वांनाच स्टेजवर स्थान देण्यात यावं. मोजक्याच लोकांना स्टेजवर स्थान देण्यात आलं. आणि आमदार आणि राजकीय पदाधिकारी यांना व्हीव्हीआयपीमध्ये बसविण्यात आलं.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ विधानावर प्रतिक्रिया –
राजकारणात पुर्णविराम नव्हे तर स्वल्पविराम असतो, महायुती सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील असं म्हटलं होतं. दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना अजून अपेक्षा असेल की मी भाजपमध्ये यावं, म्हणून ते असं बोलले असतील.