पाचोरा, 31 जुलै: चाळीसगाव येथे मंजूर झालेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पाचोरा आणि भडगाव हे दोन्ही तालुके जोडू नयेत, अशी आपली भूमिका कायम असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. तसेच या संदर्भातील प्रस्ताव व्यवहार्य (फिजिबल) नसून तो नाकारला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा मोठा दावा त्यांनी केला. पाचोऱ्यात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाल्यानंतर पाचोरा-भडगाव तालुके त्या कार्यालयाशी जोडण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या निर्णयामुळे पाचोरा-भडगावमधील नागरिकांवर अन्याय होईल, अशी भूमिका आमदार किशोर आप्पा पाटील मांडली आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही आमदारांना एकत्र बसवून मार्ग काढावा, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.
View this post on Instagram
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझा चाळीसगावच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला कोणताही विरोध नाही. मी तर पूर्वी सांगितलं की, चाळीसगावला केंद्रशासित प्रदेश करून टाका माझी कुठलीही हरकत नाही. मात्र, त्यासाठी पाचोरा-भडगावच्या जनतेवर अन्याय होता कामा नये.
आपल्या भूमिकेचे समर्थन करत त्यांनी भौगोलिक अंतराचाही मुद्दा मांडला. “माझ्या मतदारसंघातील लासगाव, सामनेर, राणीचे बांबरूड, दहिगाव, वरसाडे, पिंपळगाव हरेश्वर, वडगाव यांसारख्या गावांतील नागरिकांना चाळीसगाव गाठण्यासाठी सुमारे ८५ ते ९० किलोमीटरचा प्रवास करावा लागेल. अशा परिस्थितीत नागरिकांना जवळ असलेल्या जळगावला जाणे अधिक सोयीचे आहे. त्यामुळे पाचोरा-भडगावचा कारभार जळगावशीच कायम ठेवावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.
मी माझ्या मतदारसंघाला शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे निवेदने सादर केली आहेत. यासोबतच, मुख्यमंत्री महोदयांनी मला शब्द दिला आहे की, हा प्रस्ताव व्यवहार्य (फिजिबल) नाही. त्यामुळे हा प्रस्ताव १०० टक्के नाकारला जाईल, असा दावा आमदार पाटील यांनी केला आहे.






