• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्याच्या सर्वसमावेशक व‍िकासाला सर्वोच्च प्राधान्य; पालकमंत्री गुलाबराव पाटलांची ग्वाही

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 15, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर
जळगाव जिल्ह्याच्या सर्वसमावेशक व‍िकासाला सर्वोच्च प्राधान्य; पालकमंत्री गुलाबराव पाटलांची ग्वाही

जळगाव, 15 ऑगस्ट : शेतकरी, वंच‍ित, दुर्लक्ष‍ित घटक, सर्वसामान्य नागर‍िक यांच्या जीवनात शासकीय योजना व मदतीच्या रूपाने नवी पहाट आणण्याचे काम शासन करत आहे. ‍ज‍िल्ह्यात पायाभूत सुव‍िधांचे जाळे न‍िर्माण करण्यात येत आहे. यापुढेही जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे द‍िली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण –
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी शुभेच्छा संदेशात पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, महानगर पालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, परीव‍िक्षाधीन ज‍िल्हाध‍िकारी अर्पीत चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, प्रांतध‍िकारी महेश सुधळकर, तहसीलदार व‍िजय बनसोडे तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

काय म्हणाले पालकमंत्री –
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात सध्या “मेरी मिट्टी – मेरा देश” म्हणजेच “माझी माती – माझा देश” हे अभियान राबविण्यात येत आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे, असे नमूद करून ते पुढे म्हणाले की, शेतकरी हा आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासन विविध योजना राबवीत आहेत. या शेतकऱ्यांच्या पाठिशी आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे.

साडेचार लाख शेतकरी सहभागी –
तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात मागील वर्षभरात २१ हजार शेतकऱ्यांना नव्याने ठिबक सिंचनासाठी सबसिडी दिली. यामुळे २० हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. ५० हजार शेतकऱ्यांना विम्याचे ३४ कोटी रूपये वाटप करण्यात आले आहेत‌. जवळपास एक हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक जास्त कांदाचाळी जळगाव जिल्ह्यात निर्माण करण्यात आल्या, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांग‍ितले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा-२ योजना-
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा व्हावा या उद्देशाने “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा-२” ही योजना शासन राबवत आहे. या योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १६५ उपकेंद्रामध्ये एकूण १०६२ मेगावॅट क्षमतेपर्यंत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प स्थापित केला जाणार आहे. याकरिता ४ हजार नऊशे एकर शासकीय जमिनीचा प्रस्ताव मंजूरीच्या प्रक्रियेत आहे.

सामाज‍िक न्यायासाठी काम –
गरीब, गरजू, वंचितांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहेत. असे नमूद करून पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील ५१ हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्री-शीप योजनेचा लाभ देण्यात आला. वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या ९७४ विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत ७ कोटी २३ लाख रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ११० तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्यात आले आहे.‌ ८ हजार उसतोड कामगारांना ओळखपत्र देण्यात आलेले आहेत.

रस्त्यांच्या कामांना प्राधान्य –
ज‍िल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हायब्रीड अन्युटी अंतर्गत ३६५ किलोमीटरचे रस्त्यांसाठी सुमारे ९०० कोटी निधीतून कामे पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. शहरातील शिवाजीनगर, भडगाव तालुक्यातील कजगाव व रावेर तालुक्यातील निंभोरा, बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील १०० कोटी निधीतून उड्डाणपूल पूर्ण करण्यात आले आहेत. असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांग‍ितले.

७७ हजार घरकुले पूर्ण –
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र व राज्य शासनाच्या विविध आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. ज‍िल्ह्यात व‍िव‍िध योजनांमध्ये ७७ हजार ५०० घरकुलांचे बांधकामे पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गंत जिल्ह्यात ६० हजार घरकुले पूर्ण झाली आहेत. शबरी योजनेंतर्गत ४ हजार ६०५ घरकुले पूर्ण करण्यात आली असून रमाई आवास योजनेंतर्गंत १२ हजार ९३१ घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत.

जलजीवन मिशनबाबत काय म्हणाले पालकमंत्री –
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘हर घर नल से जल” हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले जलजीवन मिशन जिल्ह्यात आकार घेत आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत एकूण २६ योजना राबविल्या जात असून त्यासाठी ५२६ कोटी ५६ लाख रूपये खर्च करण्यात येत आहेत. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे १४०० योजना राबविल्या जात असून १ हजार २३९ कोटी रूपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

केळी व‍िकास महामंडळाची स्थापना होणार –
जळगांव येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केळी विकास महामंडळाची घोषणा केली आहे. या महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटींचा न‍िधी उपलब्ध होणार आहे. लवकरच जळगांव येथे केळी महामंडळाची स्थापना ही होणार आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जळगांव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करणार असल्याची ही घोषणा केली असल्याने विभागीय आयुक्तालयांची ही घोषणा अंमलात आणण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. अशी माह‍िती ही पालकमंत्र्यांनी यावेळी द‍िली.

मूलभूत सुव‍िधांच्या न‍िर्माण करण्यावर भर –
आजपासून राज्यातील सर्व शासकिय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत असे नमूद करून पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४५२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. आदिवासी घटक कार्यक्रमात ५५ कोटी ६६ लाख रूपये आदिवासी समुदायाच्या विकास योजनांसाठी खर्च करण्यात आले. अनुसूचित जाती उपयोजनेत ९१ कोटी ५९ लाख खर्च करण्यात आला.

शासकीय वाहनांची खरेदी –
जिल्हा नियोजनच्या या निधीतून जिल्ह्यात मुलभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत आहे. जळगांव पोलीस दला करिता कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता ८५ दुचाकी वाहने व २७ चारचाकी वाहने खरेदी करून देण्यात आली. जिल्हा परिषदेसाठी १० रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विशेष सन्मान –
गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्राप्त रावेर पोलीस ठाण्याचे न‍िरीक्षक कैलास नागरे यांचा यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व‍िशेष सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा विकासाचा सोळा कलमी कार्यक्रम व बाला कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या भुसावळ तालुक्यातील क‍िन्ही ज‍िल्हा पर‍िषद शाळेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. ज‍िल्हा न‍ियोजन अध‍िकारी प्रतापराव पाटील यांनी द‍िलेल्या उत्कृष्ट सेवेकर‍िता त्यांच्याही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पाच वाहनांचे अनावरण –
केंद्र पुरस्कृत योजना पशु स्वास्थ्य व रोग न‍ियंत्रण कार्यक्रमांतर्गंत ज‍िल्ह्यातील फ‍िरते पशुवैद्यकीय पथकांसाठी ५ चारचाकी नवीन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. या वाहनांचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी ज‍िल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील, ज‍िल्हा पशुसंवर्धन अध‍िकारी डॉ.वाहेद तडवी, ज‍िल्हा पशु वैद्यकीय सर्वच‍िक‍ित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ.गणेश भांडारकर आदी उपस्थ‍ित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: guardian ministergulabrao patilindependence day

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी खूशखबर! वीज स्वस्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, नेमकी बातमी काय?

महाराष्ट्रासाठी खूशखबर! वीज स्वस्त होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती, नेमकी बातमी काय?

June 26, 2025
किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, जळगावचा हवामान अंदाज काय?

किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे, जळगावचा हवामान अंदाज काय?

June 26, 2025
Pachora News : शिक्षकाची शाळेतच आत्महत्या, पाचोरा शहरातील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

आर्थिक शिस्त, गतिमान प्रशासनासाठी समितीची प्रभावी कार्यपद्धती ठरविणार – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

June 25, 2025
Pachora News : पाचोरा परिवहन विभागातर्फे पाचोरा एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत पास वाटप

Pachora News : पाचोरा परिवहन विभागातर्फे पाचोरा एस एस एम एम कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थीनींना मोफत पास वाटप

June 25, 2025
आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

June 25, 2025
आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या हिमांशीला नवी उमेद; सामाजिक जाणीवेतून शालेय साहित्याचे वाटप

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या हिमांशीला नवी उमेद; सामाजिक जाणीवेतून शालेय साहित्याचे वाटप

June 25, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page