जळगाव, 22 एप्रिल: नागरी सेवा दिन 2026 आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2025-26’ अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
View this post on Instagram
प्रशासकीय सेवेतील गतिमानता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार जळगाव जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना देण्यात आला. मिनल करनवाल यांनी जळगाव येथे कार्यरत असताना ‘घरकुल योजना’ आणि ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली होती. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण विकासाला गती मिळाली आहे.
अनेक नाविन्यपूर्ण योजना यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल राज्य शासनाने मिनल करनवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दरम्यान, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिनल करनवाल यांना ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकजकुमार तसेच पुरस्कारार्थी उपस्थित होते.






