अहमदाबाद, 31 मे: क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि रोमांचक लीग समजल्या जाणाऱ्या टाटा आयपीएल २०२६ (IPL 2026) चा अंतिम सामना आज, ३१ मे २०२६ रोजी खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा हाय-व्होल्टेज महामुकाबला रंगणार असून, यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) हे दोन बलाढ्य संघ आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी एकमेकांशी भिडतील. संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी जगभरातील क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दोन्ही संघांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास –
रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यंदाच्या हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे. ‘क्वालिफायर १’ सामन्यात बंगळुरूने गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी धुव्वा उडवत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे, या पराभवानंतर शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सने जबरदस्त पुनरागमन केले. त्यांनी ‘क्वालिफायर २’ मध्ये राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.
किंग कोहली आणि शुभमन गिल यांच्या कामगिरीकडे असेल लक्ष –
या महाफायनलमध्ये अनुभवी विराट कोहली आणि युवा स्टार शुभमन गिल यांच्यातील फलंदाजीची जुगलबंदी मुख्य आकर्षण ठरेल. बंगळुरूकडे कोहलीसोबतच कर्णधार रजत पाटीदार आणि अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्यासारखे मॅच-विनर खेळाडू आहेत. तर गुजरात टायटन्सची ताकद त्यांचे तडाखेबंद सलामीवीर साई सुदर्शन, जोस बटलर आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांच्यावर अवलंबून असेल.
इतिहासाची सुवर्णसंधी –
गेल्या वर्षी आपले पहिलेवहिले आयपीएल जेतेपद पटकावणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर २०२२ चे चॅम्पियन्स असलेले गुजरात टायटन्स आपल्या घरच्या मैदानावर (Home Ground) दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी पूर्ण ताकद लावेल. अहमदाबादच्या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, नाणेफेक (Toss) जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजीचा काय निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






