जालना, 31 मे: मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा कडक आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर काल 30 मे च्या रात्री उशिरा आपले उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत दिवसभरात झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर प्रमुख मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांच्यासह सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत दाखल झाले. यावेळी शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, शासनाने दिलेल्या नव्या प्रस्तावावर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एकमत झाले आणि जरांगे यांनी उपोषण स्थगित केले.
जरांगेंचं दिवसभर रणरणत्या उन्हात आंदोलन–
मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवाली सराटीत कोणत्याही मंडपाशिवाय, रखरखत्या उन्हात बाजावर बसून ‘अन्न-पाण्याचा’ त्याग करत आमरण उपोषण सुरू केले होते. वाढत्या उन्हामुळे त्यांच्या प्रकृतीची चिंता निर्माण झाली होती. आंदोलनाची तीव्रता पाहून राज्य शासनाने तातडीने मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ अंतरवालीत पाठवले. सुरुवातीला चर्चेत आलेले अडथळे दूर करण्यासाठी मध्यरात्री बैठक पार पडली. या बैठकीनंतर अंतिम तोडगा निघाला.
या प्रमुख मागण्यांवर झाली सहमती –
- ५८ लाख कुणबी नोंदी: सरकारने उर्वरित सर्व कुणबी नोंदींची प्रक्रिया विभागीय आयुक्तांमार्फत तातडीने पूर्ण करण्याचे मान्य केले.
- स्वतंत्र मंत्रालय: मराठा आणि कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यास सरकारने तत्त्वतः मान्यता दिली.
- गुन्हे मागे घेणे: आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू केली जाईल.
- जीआर आणि नोकऱ्या: सातारा संस्थानच्या गॅझेटियर संदर्भात तातडीने शासन निर्णय (GR) काढणे आणि आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारी कंपन्यांत (महावितरण/MIDC) नोकऱ्या देण्याचे मान्य करण्यात आले.
जरांगेंची शासनाला 2 जूनपर्यंतची मुदत –
उपोषण सोडताना मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांनी फक्त उपोषण मागे घेतले आहे, आंदेलन संपवलेले नाही. लेखी आदेश आणि अधिकृत शासन निर्णय (GR) काढण्यासाठी त्यांनी सरकारला २ जून २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.
गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल –
उपोषण सोडल्यानंतर लगेचच प्रकृती खालावल्यामुळे जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुढील 48 तास मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांच्या निगरणाखाली ठेवण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आलेली आहे.
मनोज जरांगेंच्या या आहेत मागण्या:
१. संपूर्ण मराठा समाजाला तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या.
२. कुणबी प्रमाणपत्रधारकांना तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र मिळावे.
३. १९९४ च्या धर्तीवर नवीन अध्यादेश काढा.
४. विद्यमान मराठा उपसमिती तात्काळ बरखास्त करा.
५. आंदोलकांवरील सर्व पोलीस गुन्हे सरसकट मागे घ्या.
६. आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना सरकारी नोकरी द्या.
७. ‘सारथी’ संस्थेच्या सर्व योजना पूर्ववत सुरू करा.
८. आर्थिक महामंडळांचे प्रलंबित परतावे तात्काळ द्या.
९. मराठा-कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा.






