जळगाव, 16 ऑगस्ट: केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली व आदिवासी विकास विभागाच्या समन्वयातून ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत सातपुडा पर्वतरांगांतील अतिदुर्गम मोहमांडली गावात सर्वसमावेशक आरोग्य तपासणी व आरोग्यसेवा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दीपल पाटील व डॉ. सलमान पटेल यांच्या देखरेखीखाली आरोग्य विभागाच्या पथकाने हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. डॉ. रमीज सय्यद, मुबारक तडवी, वैशाली तळेले तसेच आशा कार्यकर्तींनी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत विशेष योगदान दिले.
‘आरोग्यदायी आदिवासी समाज–सशक्त आदिवासी समाज’ या संकल्पनेतून नागरिकांची BP, BSL, NCD अंतर्गत आवश्यक आरोग्य तपासणी करण्यात आली. मुली, गरोदर माता आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची विशेष तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.
दुर्गम भागात सुरक्षित प्रसूती –
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मोहमांडली येथील उपकेंद्रात एका आदिवासी महिलेची सुरक्षित व सुखरूप प्रसूती करण्यात आली. माता व नवजात बाळाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दुर्गम भागात वेळेवर प्रसूती सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या अभियानाच्या उद्दिष्टाला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली.
दुर्गम आदिवासी भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम ‘कोणीही आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी ठरला आहे. ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ हे आदिवासी समाजाच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी एक दृढ पाऊल असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.






