अंतरवाली (जालना), 25 फेब्रुवारी : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आज चांगलेच आक्रमक झाले असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, ते अंतरवाली येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मनोज जरांगे काय म्हणाले? –
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज निर्णायक बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी पहिल्यांदाच थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत, यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय, या लोकांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
मनोज जरांगे आक्रमक –
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस प्रयत्न करत आहेत. फडणवीस यांना माझा बळी हवा असेल, तर मी सागर बंगल्यावर जायला तयार आहे. माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्या विरोधात तक्रारी शोधल्या जात असून हे देवेंद्र फडणवीसचे षडयंत्र असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
फडणवीसांना आयुष्यातून उठवणार –
अजय बारसकर देखील फडणवीस यांनी उभा केलाय. मीडियावर देखील दबाव टाकण्यात आला आहे. फडणवीस तू माझा बळी घेणार असेल तर उपोषण करून मरण्यापेक्षा तुझ्या दारात मरतो, तू गनिमा कावा करत असशील तर तुला आयुष्यातून उठवणार, असा मनोज जरांगे एकेरी उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी ठाम –
मनोज जरांगे यांनी आजच्या निर्णायक बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सागर बंगल्यावर येत असल्याचे आव्हान दिले. दरम्यान, मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी ठाम असून त्यासाठीची तयार आता सुरू झाली आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांच्या गंभीर आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यातून तातडीने मुंबईसाठी रवाना