चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 17 मार्च : शिवतीर्थावर जेव्हा रणशिंग फूकलं जातं, मुंबईतून जेव्हा एखादी गोष्ट बोलली जाते, तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरुन चालतो. देशातील जनता ही आमच्यासोबत आहे. एकच नारा पुन्हा घेऊन अबकी बार भाजपा तडीपार हा संदेश घेऊन गावागावात जा आणि या हुकूमशाही राजवटीचा अंत करा, असे आवाहन करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा 63 दिवसांनंतर आज महाराष्ट्रातील मुंबईत समारोप झाला. यानिमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यमक्रमाला इंडिया आघाडीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.
मंचावर दिग्गज नेते उपस्थित –
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मुंबईतील मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढली. या पदयात्रेत त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियांका गांधी वड्रा आणि अभिनेत्री स्वरा भास्कर देखील उपस्थित आहेत. यावेळी मंचावर डाव्या बाजूला राहुल गांधी, एम. के. स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, प्रकाश आंबेडकर, तेजस्वी यादव, के सी वेणुगोपाल, प्रियांका वाड्रा, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राऊत, जयंत पाटील, विजय वड्डेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, तुषार गांधी तर उजवीकडे मल्लिकाजूर्न खर्गे, शरद पवार, सोरेन, मेहबुबा मुफ्ती, रेवंथ रेड्डी, वर्षा गायकवाड, सौरभ भारद्वाज, सुखविंदर सखू, अशोक गेहलोत, सुशिलकुमार शिंदे, आदित्य ठाकरे आदी. नेते उपस्थित आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे –
यावेळी कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देश वाचला तर आम्ही वाचू. व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे. कुणापेक्षाही देश मोठा आहे. आज पर्यंत आपण अनेक अनुभव घेतले. देशासाठी एक मजबूत सरकार पाहिजे, असं वाटलं होतं. अटलजींच्या वेळी देशात चांगलं वातावरण होते. मात्र, 2014 पासून देशात एकाचं सरकार आहे. कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. आजच वेळ आली आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. आपला इतिहास हा तोडा फोडा आणि राज्य करा असा असेल तर आपल्यामध्ये जो फूट पाडत असेल, त्याला तोडा फोडा आणि त्याच्या छातडावर राज्य करा, हे दाखवायची वेळ आली आहे.
मला खात्री आहे, शिवतीर्थावर जेव्हा रणशिंग फूकलं जातं, मुंबईतून जेव्हा एखादी गोष्ट बोलली जाते, तेव्हा संपूर्ण देश त्या मार्गावरुन चालतो. देशातील जनता ही आमच्यासोबत आहे. एकच नारा पुन्हा घेऊन अबकी बार भाजपा तडीपार हा संदेश घेऊन गावागावात जा आणि या हुकूमशाही राजवटीचा अंत करा, एवढीच एक विनंती करतो, असेही आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
न्याय यात्रेचा समारोप –
काँग्रेस पक्षाच्या या न्याय यात्रेच्या समारोपासाठी शिवाजी पार्क येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा यात समावेश आहे. शिवसेना (UBT), NCP (शरद पवार गट), आम आदमी पार्टी (AAP) यांच्यासह I.N.D.I.A. आघाडीमधील इतर पक्षांचे नेतेही उपस्थित आहेत. ही सभा विरोधकांच्या ताकदीचे प्रदर्शन असल्याचेही मानले जात आहे.