मुंबई : राज्याच्या राजकारणात 2022 मध्ये जून महिन्यात एक मोठा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आधी सुरत मग गुवाहटीला गेले. या संपूर्ण घटनेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा गौफ्यस्फोट केला आहे. गुवाहटीला जाताना मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. मी त्यांच्याशी बोलतच गेलो, असा गौफ्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत बोलताना केला.
काय म्हणाले एकनाथ शिंदे –
एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी खुलेआम गेले. बोलत बोलत गेलो. मला उद्धवजी यांचा फोन आला होता. मी रस्त्यात होतो. मी फोनवर बोलतच गेलो. त्यांनी मला आव्हान दिले. परत येऊन दाखव. वरळीवरुन जायचे आहे. मुंबईत परत यायचे आहे. लाखो लोक येतील. रस्ता जाम करू. खून खराबा होईल. आमदारांना विधानभवनात जाऊ देणार नाही. पण मी त्यांना म्हणालो, पाहा, मीसुद्धा बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे. मीसुद्धा आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. मी बालपणापासून मेहनती आहे. पक्षाला मी जीवन समर्पित केले आहे आणि मला हे सर्व नको आहे आणि जर कुणाला हे हवं असेल, तर त्याला मी जबाबदार नसेन. त्यामुळे मग मी तेथून परतलो. हेलिकॉप्टर बाजूला होते. मला हेलिकॉप्टरमध्ये बसायला सांगितले. पण मी त्यात बसलो नाही. मी रस्त्याने आलो. हे कुणापासून घाबरवतात, कुणाला घाबरवतात, अशी टीकाही त्यांनी केली.
शिवसेनेत पक्षफूट –
जून 2022 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूंकप घडना. शिवसेना पक्षात फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदार यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. नंतर हे सर्व आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले. नंतर गोव्याला आले आणि तेथून सरळ विधानभवनात आले. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत मिळून युतीचे सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
इतकेच नव्हे तर पुन्हा एक वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पटली. अजित पवार यांच्यासोबत काही आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी महायुतीत सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मागील अडीच वर्षात राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व असे बदल झाले आहेत. त्यात शिवसेना पक्षफुटीची घटना ही फक्त राज्यस्तरावरच नाही तर देशपातळीवर एक मोठा विषय ठरली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल मोठा गौफ्यस्फोट केला आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत आणखी काय काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
“…गब्बर बहुत डरा हुआ है”, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांचे जोरदार भाषण






