बीड, 27 डिसेंबर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस हे चांगलेच चर्चेत आहेत. सुरेश धस हे सातत्याने नवे खुलासे समोर आणत सरपंच हत्या प्रकरणाचा खरा सुत्राधार कोण याचा पोलिसांनी शोध घ्यावा, याची मागणी करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. यावरून सुरेश धस यांनी मिटकरींना जोरदार इशारा दिला आहे.
अमोल मिटकरी काय म्हणाले? –
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचं काम बीड जिल्ह्यातील काही राजकीय नेते करत असल्याचे दिसून येत आहे. सुरेश धस हे महायुतीचे आमदार आहेत. मात्र, आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही. आणि दोघंही बहिण-भावांना मंत्रीपद मिळाले आणि पंकजाताई तसेच धनंजय मुंडे एकत्र आल्याने त्याचा पोटशूळ सुरू झाला आहे.
दरम्यान, आमचं म्हणणे आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्येचं कोणी समर्थन करू शकत नाही. जो कोणी दोषी असेल, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. ही भूमिका सुरुवातीपासून मांडली आहे. अशीच भूमिका मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील मांडली. पण आता या प्रकरणात सुरेश धस राजकारण करतात, हे कुठंतरी थांबले पाहिजे. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला शोभत नसून ते महायुतीचे घटक असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.
हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive
सुरेश धस यांचा इशारा –
आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. धस म्हणाले की, “अमोल मिटकरी हे फार लहान आहेत. माझी त्यांना एकदा विनंती आहे की, अमोल तू कुणाच्याही नादात लाग पण या रगेलच्या नादी लागू नको. तुला लय महागात पडलं. मी आता एकदा ऐकून घेतो वडिलकीच्या नात्याने एकदा त्याला समज देतो. तुझं कुणाकडंही दुकान चालवं…माझ्यावर दुकाने चालवू नको…तुझं अवघड होईल,” अशा शब्दात एकेरी उल्लेख करत सुरेश धस यांनी अमोल मिटकरी यांना इशारा दिला आहे.
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण –
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणाबाबत नवे खुलासे करत विधानसभेत जोरदार आवाज उठवला होता. खरंतर, याप्रकरणाचा रोख मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळीक मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्यावर घेतला जात असल्याने धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला जातोय. दरम्यान, देशमुख यांची हत्या करणारे गुन्हेगार आणि त्यामागचे सूत्रधार यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ठ केले आहे. असे असले तरी पुढील काही दिवस सरपंच हत्याप्रकरणावरून वातावरण तापणार असल्याचे दिसून येत आहे.
हेही पाहा : मुक्त विद्यापीठात शिक्षण, शिपाई ते आता आर्मीत मोठा अधिकारी lieutenant ashok patil khandesh interview