चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 4 जून: विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. अर्ज माघारीच्या वेळेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या असून, अखेर रिंगणातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रमुख पक्षांच्या काही उमेदवारांनी माघार घेतली असली, तरी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे आणि भुसावळचे माजी नगराध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी आपला अर्ज मागे न घेतल्यामुळे आता ही निवडणूक चौरंगी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काय घडलं? –
विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि अपक्ष असे एकूण 16 उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. यानंतर महायुती तसेच महाविकास आघाडींमध्ये बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर एकूण 14 अपक्ष उमेदवारांपैकी 12 उमेवादवारांनी माघार घेतली. तर दोन उमेदवारांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला. शिंदे सेनेच्या जळगावच्या नगरसेविका रेश्मा काळे आणि भुसावळचे अनिल चौधरी या दोन नावांचा यामध्ये समावेश आहे.
विधानपरिषदेसाठी जळगावात चौरंगी लढत –
जळगाव विधानपरिषदेसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नगरसेवकांच्या भेटी घ्यायला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून शरद तायडे निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. यासोबतच, महायुतीत बंडखोरी केलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे तर भुसावळचे अनिल चौधरी हे दोघेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे विधानपरिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत चौरंगी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे –
- नंदकिशोर भागवत महाजन – भाजप
- तायडे शरद शामराव – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
- चौधरी अनिल छबिलदास – अपक्ष
- रेश्मा कुंदन काळे – अपक्ष
महायुतीत बंड कायम –
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था हा मतदारसंघ महायुतीत भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता, महायुतीचा धर्म पाळत वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी 1 जून रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आज उमेवादवारी अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशी देखील अपक्ष निवडणूक लढवण्याचा आपला निर्धार कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे, अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी रेश्मा काळे या कोणाच्याही संपर्कात नव्हत्या. तसेच सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन उमेदवारांची माघार –
अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर स्वतः राष्ट्रवादी अजित पवार गटातील तिन्ही बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जळगावातील कार्यालयात जात याबाबतची माहिती दिली असून महायुतीसमोरील अंतर्गत बंडखोरी शमवण्यात नेत्यांना अंशतः यश आल्याचे सांगितले जात आहे.
जळगावची चौरंगी लढत ठरणार लक्षवेधी –
अर्ज माघारीची मुदत संपताच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. यामध्ये जळगावची लढत ही चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हे या निवडणुकीत मतदार असल्याने, मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आता गुप्त आणि उघड बैठकांचे सत्र सुरू होईल. दरम्यान, जळगावच्या या प्रतिष्ठेच्या लढतीत अखेर कोण बाजी मारणार, याकडे जळगावसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे –
- आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद
- हितेंद्र रमेश देशमुख
- चौधरी निलेश सुरेश
- चौधरी सचिन संतोषभाऊ
- जावेद इकबाल अब्दुल रशीद
- निलेश गणेश झोपे
- शेख दानिश शेख निसार
- कलीमखान हैदरखान मनियार
- घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील
- प्रविण गंगाराम पाटील
- जंगले सुनिल नेमिदास
- दिपक काशिनाथ धांडे
हेही वाचा: राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील ‘या’ चार ग्रामपंचायतींचा नवी दिल्लीत गौरव






