जळगाव, 29 एप्रिल: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. नववधूला घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा धरणागाव तालुक्यातील वराड खुर्दजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पूजा रवी वाघळकर असे मृत नववधूचे नाव असून, दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर अशी अन्य मृतांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं? –
प्राथमिक माहितीनुसार, गुजरातच्या वापी येथून लग्न उरकून वऱ्हाड घेऊन एक क्रूझर कार अकोल्याकडे जात होती. वाहनात एकूण 14 प्रवासी प्रवास करत होते. अशातच धरणगाव तालुक्यातील वराड खुर्दजवळ क्रुझर वाहनाचे टायर फुटल्याने गाडीचा ताबा सुटला आणि ती थेट रस्त्यालगत उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की वाहन पलटी झाले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश –
अपघातानंतर जखमींना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर मदतकार्य सुरू असताना, मंत्री गिरीश महाजन यांच्या वैद्यकीय सहाय्यता टीमचे आरोग्यदूत शिवाजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जखमींना आवश्यक ती मदत व सहकार्य केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली आणि एकच आक्रोश उसळला.
विवाह समारंभाच्या काही तासांतच नववधूचा मृत्यू –
लग्नाचा आनंद, उत्साह आणि नव्या आयुष्याची स्वप्नं घेऊन निघालेल्या या कुटुंबावर काळाने वाटेतच क्रूर झडप घातली. क्षणात सगळं काही उद्ध्वस्त झालं. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेही एकाच कुटुंबातील असल्याने दुःख अधिकच दाटून आले आहे. दुर्दैवाने विवाह समारंभाच्या काही तासांतच नववधू पूजा रवी वाघळकर हिचा मृत्यू झाला. ज्या हातांवरील मेहंदी अजूनही ताजी होती, ज्यांनी नव्या संसाराची स्वप्नं रंगवली होती, त्याच हातांना मृत्यूला कवटाळण्याची दुर्दैवी वेळ पूजावर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.






