मुंबई, 14 जून : आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांना 20 हजार रूपये अनुदान देण्याचा हा निर्णय असून यामध्ये मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. याबाबत प्रशासकीय मंजुरी देखील देण्यात आली आहे.
नेमकी बातमी काय? –
महायुती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षी 2024 साली पार पडलेल्या बैठकीत तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन 2024 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रु.20 हजार रूपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत निर्देश दिले होते. यावेळी सन 2023-24 मध्ये विभागीय आयुक्त यांच्याकडून शासनाला एकूण 1 हजार 109 दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती.
1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान –
महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार (GR), गतवर्षीप्रमाणे यंदादेखील तिर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी रु.20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपये इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना –
आषाढी वारीचा मुख्य सोहळा रविवार 6 जुलै रोजी पंढरपूर येथे पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणांनी जय्यत तयारी केली असून वारी सोहळ्यासाठी राज्य पोलीस दलातील 6,000 पोलीस कर्मचारी आणि 3,200 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच राज्य राखीव पोलीस दलाच्या सहा तुकड्यांनाही सतर्कतेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण पालखी मार्गावर ड्रोनच्या साहाय्याने देखरेख ठेवण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाल्याचे सांगितले जात आहे.
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. दरम्यान, सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील उपमुख्यमंत्र्यांनी दिलीय. पुणे विधानभवन येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-2025 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.