ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 2 मे: महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने पाचोरा येथे स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील व पाचोरा-भडगाव शिवसेना युवा सेनेच्या पुढाकारातून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांनी समाजासाठी योगदान देत सक्षम पिढी घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. शासनाच्या विविध प्रशासकीय विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी नवोदित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परिसराच्या विकासात हातभार लावावा, असेही त्यांनी सांगितले. शहरात अद्ययावत वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध असून त्यामध्ये लाखो रुपयांची पुस्तके असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन परिश्रमपूर्वक अभ्यास करावा आणि अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेसाठी पुढे यावे – प्रा. राजेंद्र चिंचोले
प्रमुख मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून करिअरच्या विविध संधींचा शोध घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. शैक्षणिक बुद्धिमत्तेबरोबरच कौशल्याधारित व व्यावसायिक बुद्धिमत्तेचा वापर करून जीवनात यशस्वी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा आणि तळागाळातील विद्यार्थ्यांनीही राष्ट्रसेवेसाठी पुढे यावे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल करिअर घडवा – प्रांताधिकारी भूषण अहिरे
प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी आपल्या मनोगतात युवकांना प्रत्येक क्षेत्रात देशाचे नाव उंचावण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय निश्चित करून एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे, असे ते म्हणाले. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उज्ज्वल करिअर घडवण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
देशाचे नाव उंचावण्याची युवकांना संधी – मुख्याधिकारी मंगेश देवरे
नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी अशा परीक्षांची तयारी करून राष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे, असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उंचावण्याची संधी युवकांना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सत्कारार्थींमधून गौरव गोसावी, गरिमा पाटील आणि राहुल खैरनार यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या यशामागील प्रवास, अडचणी आणि मेहनतीचे अनुभव मांडले. या कार्यक्रमास शिक्षणप्रेमी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक गजू पाटील, राजेश पाटील, नाना वाघ, बबलू पाटील, नितीन पाटील आणि विजय भोई यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक गजू पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन नाना वाघ यांनी करून आभार मानले.
यांचा झाला गौरव –
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये गौरव गणेश गोसावी (डेप्युटी मॅनेजर, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड), ऋषिकेश पाटील (न्यायाधीश पदासाठी निवड), हर्षल अरुण पाटील (बँक प्रोबेशनरी ऑफिसर व इन्कम टॅक्स सुपरिटेंडंट), रोहित आत्माराम महाजन (STI), युगंधरा राजेंद्रसिंग पाटील (STI), निरंजन भालेराव पाटील (STI), स्वप्नील गोपाळ पाटील (नगर रचनाकार), ईश्वरी बाळकृष्ण पाटील (नगर रचनाकार), गरिमा निकित पाटील (कर सहाय्यक), सिद्धार्थ चौधरी (आयकर निरीक्षक), अजय सिंग परदेसी (PSI), योगेश जाधव (PSI), जितेंद्र दिलीप पाटील (वैज्ञानिक सहाय्यक) आणि शैलेंद्र गुलाब पाटील (न्यायवैद्यक विश्लेषक) यांचा समावेश होता.
याशिवाय पोलीस व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या ८३ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जेईई परीक्षेत यश मिळवलेल्या अमेय मोराणकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय यश संपादन करणाऱ्या सहा खेळाडूंना गौरविण्यात आले. तसेच पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या तीन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सुभाष रामदास राठोड यांना जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या सर्व सत्कारांद्वारे एकूण १०५ जणांचा गौरव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती –
या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, जिल्हाध्यक्ष (शिवसेना) रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, तसेच राजेंद्र पाटील, विनोद तावडे, सुमित सावंत, भोला पाटील, रहेमान तडवी, रहीम बागवान आणि अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.






