पाचोरा, 30 एप्रिल: कृषी विभागाच्या वतीने पाचोरा शहरातील आशीर्वाद हॉल येथे पाचोरा व भडगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी संयुक्त खरीपपूर्व नियोजन बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. दरम्यान, या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ संकल्पनेबाबत महत्वपुर्ण भाष्य केले.
‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही संकल्पना प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे. यासाठी राज्य शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. या अनुषंगाने पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आगामी काळात धरणांमधील गाळ काढून तो आपल्या शेतात टाकल्यास पुढील चार-पाच वर्षांत रासायनिक खतांची गरज भासणार नाही, असे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले. तसेच शेतात गाळ टाकताना महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
“…तर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी सक्षम होईल!” –
वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या नाल्यां व धरणांमधील गाळ काढण्यासाठी सध्या परवानगी मिळत नसल्याची अडचण आहे. यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून सविस्तर अहवाल तयार करून जिल्हाधिकारी, वनसंरक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. धरणांमधील गाळ काढण्यास ‘विशेष बाब’ म्हणून परवानगी मिळावी, यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील.

तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीतील धरणांमधील गाळ काढण्यास विशेष परवानगी मिळाल्यास योग्य पद्धतीने खोलीकरण होऊन पाण्याचा मुबलक साठा निर्माण होईल. परिणामी, पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी शंभर टक्के सक्षम होईल, असा विश्वास आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: Update: बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश अन् विधानपरिषद आमदारकीसाठी दाखल केला अर्ज






