अमरावती, 14 जून : अमरावतीतील गुरूकुंज मोझरी येथे प्रहारचे सर्वेसर्वा तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे शेतकरी कर्जमाफी तसेच दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू होते. गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरू असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका स्पष्ठ केली. यानंतर बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.
बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन –
अमरावती येथील गुरुकुंज मोझरी येथे शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग बांधव, विधवा महिला, मासेमारी करणाऱ्यांच्या समस्यांसाठी प्रहारचे बच्चू कडू यांनी 8 जून रोजी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आतापर्यंत या आंदोलनाला शेतकरी नेते राकेश टिकेत, मराठा आंदोलक मनोज जरांगे, आमदार रोहित पवार अशा अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहत कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. काँग्रेसने देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.
बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन मागे –
गेल्या सात दिवसांपासून बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. अशातच आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरूकुंज मोझरीत आंदोलनस्थळी भेट दिली. मंत्री उदय सामंतांनी सरकारचे पत्र दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले. मंत्री उदय सामंत आणि एका विधवा महिलेच्या हातून पाणी पित बच्चू कडू यांनी हे आंदोलन मागे घेतले.
मंत्री उदय सामंतांनी दिले सरकारचे पत्र –
आंदोलनस्थळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आज याठिकाणी भेटायला आलोय. तत्पुर्वी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही चर्चा झाली असून बच्चू कडू यांनी शासनाकडे केलेल्या मागणींवरून शासनाचे अधिकृत पत्र मी याठिकाणी घेऊन आलोय.
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, कर्जमाफीसंदर्भात येत्या 15 दिवसांच्या आता उच्चस्तरिय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल. बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील याचे पत्र घेऊन मी आलोय.
दरम्यान, बच्चू कडू यांचे आंदोलन शेतकरी, दिव्यांग तसेच विधवा महिलांच्या न्याय हक्कासाठी सुरू असून त्या आंदोलनाला न्याय देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले. यावेळी मंत्री सामंत यांनी सर्वांसमोर शासनाचे पत्र वाचून दाखवत बच्चू कडूंना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
बच्चू कडू यांचा राज्य सरकारला अल्टिमेटम –
मंत्री उदय सामंत आणि एका विधवा महिलेच्या हातून पाणी पित बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, कर्जमाफीची तारीख न दिसल्यास 2 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिलाय. कर्जमाफी न झाल्यास गांधी जयंतीला भगतसिंगगिरी करु तसेच मंत्रालयात घुसू, असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. दरम्यान, सरकारने आमचा विश्वासघात केला तर मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करून, असेही कडू म्हणाले.
मंत्री बावनकुळेंनी काल रात्री दिली होती भेट –
राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल अमरावतीत बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली होती. यानंतर त्यांनी बच्चू कडू यांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधत शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते.