बीड, 29 एप्रिल: मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या निधनामुळे सरंपचपदासाठी पोटनिवडणूक पार पडली. दरम्यान, या निवडणुकीचा आज 29 एप्रिल रोजी निकाल जाहीर झाला असून हा निकाल खूप अनपेक्षित लागला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांचा या निवडणुकीत पराभव झाला. स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांच्या फरकाने अश्विनी देशमुख यांचा पराभव केला.
नेमका निकाल कसा लागला? –
स्वरूपानंद देशमुख हे 92 मतांच्या फरकाने विजयी ठरले. पहिल्या फेरीत त्यांनी 156 मतांची आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या फेरीत ही आघाडी कमी होऊन 20 मतांवर आली. अखेरीस तिसऱ्या आणि अंतिम फेरीत त्यांनी 92 मतांनी विजय मिळवला. विजयानंतर स्वरूपानंद देशमुख हे संतोष देशमुख यांना अभिवादन करून देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पडून संतोष अण्णांना खरी श्रद्धांजली वाहावी, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, स्वरूपानंद देशमुख यांनी शेवटपर्यंत अर्ज मागे घेण्यास नकार दिला.
धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया –
मस्साजोगच्या सरपंच पदाचा निकाला जाहीर झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, आमचा भाऊ गमावणे हे आमच्यासाठी सर्वात मोठं नुकसान आहे. त्यामुळे हा निवडणुकीतील पराभव आमच्यासाठी दुय्यम आहे. गावकऱ्यांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो.
आतापर्यंत पसरवण्यात आलेल्या अफवा यापुढे थांबवाव्यात, ही आमची विनंती आहे. न्याय मिळवण्यासाठीची लढाई अखेरीस आम्हालाच, कुटुंबीयांनाच लढावी लागणार आहे. गावकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही ही लढाई पुढे नेऊ. सीएसआर फंड आणल्याचा आरोप करण्यात आला आहे; तो पुराव्यासह सिद्ध करावा. संतोष अण्णांच्या स्वप्नातील गाव उभं करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असेही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण –
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असून, या हत्याकांडानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला. विशेषतः, या प्रकरणामुळे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले. वाल्मिक कराड हा त्यांचा निकटवर्तीय असल्याच्या चर्चांमुळे आणि दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, तर मस्साजोग गावात ग्रामस्थांनी वारंवार आंदोलन केले. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे सरपंच पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र, या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा: धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?






