मुंबई, 22 एप्रिल: केंद्रातील मोदी सरकारने महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले होते; मात्र ते नामंजूर झाल्यानंतर विरोधकांविरोधात देशभरात आंदोलन करण्यात आले. मुंबईतील वरळी येथेही भाजपकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामुळे सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि नागरिक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामध्ये ती मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांनाही खडसावताना दिसली. या घटनेवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन? –
मंत्रालयात माध्यमांसोबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, वाहतूक कोंडीमुळे संबंधित महिला त्रस्त झाल्या होत्या. मोर्चांमुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन सामान्य नागरिकांना गैरसोय होते, हे मान्यच आहे. मात्र, त्या वेळी संबंधित महिला अत्यंत अयोग्य भाषेत बोलत होत्या आणि त्यांनी महिला पोलिसांशीही गैरवर्तन केल्याचे सांगण्यात आले.
मंत्री गिरीश महाजन यांनी पुढे सांगितले की, ते त्या महिलेला समजावत होते आणि “आम्ही 10-15 मिनिटांत निघून जाऊ” असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही त्या महिलेने बाटली फेकल्याचा आणि अयोग्य भाषेचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पुढील काळात अशा प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
नेमकं प्रकरण काय? –
वरळीच्या जांबोरी मैदानातून महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर विरोधकांविरोधात निघालेला मोर्चा हा एनएससीआय डोमपर्यंत गेला, मात्र या मोर्चामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला. शाळेतून सुटलेल्या मुलांना घेण्यासाठी आलेल्या पालकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. संबंधित महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी आली होती, पण दीर्घकाळ वाहतूक कोंडीत अडकल्याने तिला मुलाची बस दिसत नव्हती. मुलाबद्दलच्या काळजीतून तिचा संताप वाढत गेला.
या परिस्थितीत, आई म्हणून मुलाच्या सुरक्षिततेची चिंता करत तिने मोर्चाविरोधात संताप व्यक्त केला. तिने पोलिसांकडे तसेच मोर्चाच्या नेतृत्वाकडेही तक्रार मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिचा राग अनावर झाला. अखेर तिने गिरीश महाजन यांच्यासमोर थेट नाराजी व्यक्त करत, “असा मोर्चा काढून वाहतूक कोंडी का करता?” असा सवाल उपस्थित केला. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.






