मुंबई, 30 एप्रिल: राज्य विधिमंडळातील 9 जागांसाठी होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याचे दिसून येत आहे. या विधानपरिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांनी प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांना शिवसेनेत घेत सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिल्याचे बोलले जात आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायला शेवटचा दिवस शिल्लक असताना, बच्चू कडू यांनी त्यांच्या प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर विधानभवनात दाखल होत विधानपरिषद आमदारकीसाठी अर्ज दाखल केला.
बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश –
मागील काही दिवसांपासून बच्चू कडू हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, कडूंच्या पक्षप्रवेशानंतर या चर्चांवर शिक्कामोर्तब झालंय. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. मात्र, यापुढेही प्रहार एक संघटना म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. यानंतर त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली.
विधानपरिषद आमदारकीसाठी दाखल केला अर्ज –
बच्चू कडू हे गेल्या एक-दोन दिवसांपासून मुंबईतच होते. आज सकाळीच मुंबईतील नंदनवन येथे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ते पोहचले. यानंतर थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यानंतर कडू यांना अधिकृतपणे शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे, पक्ष प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम होताच ते थेट विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी ते दाखल झाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ.निलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले.
बच्चू कडूंची प्रतिक्रिया –
यापुढील माझा राजकीय प्रवास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच राहील, अशी स्पष्ट घोषणा बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केली. माझी राजकारणातील सुरुवातही शिवसेना मधूनच झाली असून, आगामी 15 ते 20 वर्षेही मी याच नेतृत्वात काम करणार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन होणार नाही, असा गैरसमज काहींमध्ये निर्माण झाला असेल; मात्र गरज भासल्यास आम्ही निश्चितच आंदोलन करू, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील काळात शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी शिवसेना अधिक ताकदीने लढा उभारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वेळ पडल्यास शिवसेना रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहणार नाही, असे सांगताना त्यांनी शेतकऱ्यांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. शेतकरी आमच्यासाठी माय-बाप आहेत. त्यांच्या कष्टांमुळेच आपल्या पोटात अन्न जाते. त्यामुळे त्यांच्या हिताशी कधीही बेईमानी करणार नाही, असेही बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले.
येत्या सहा महिन्यात मंत्रीपद मिळण्याची शक्यता? –
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत आज अधिकृत प्रवेश केला आहे. सकाळीच एकनाथ शिंदे यांच्या भेटीला ते पोहचले. आता थोड्याच वेळात याविषयीची घोषणा होईल. तर काल त्यांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवारीसाठीची कागदपत्रांची बॅग त्यांच्या जवळच आहे. त्यामुळे पक्ष प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम होताच ते थेट विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करतील. कडू यांना येत्या सहा महिन्यात मंत्री पदही देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विदर्भात शिवसेनेचा आवाज बुलंद होणार आहे.






