जळगाव, 6 जून: येत्या खरीप हंगामात ‘अल नीनो’च्या संभाव्य प्रभावामुळे हवामानातील अनिश्चितता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता योग्य नियोजन करावे तसेच बदलत्या हवामान परिस्थितीत पिकांचे संरक्षण आणि उत्पादनवाढीसाठी ‘ब्रॉड बेड फरो (बीबीएफ)’ तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, ‘आत्मा’ जळगाव व कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) ममुराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म येथे आयोजित ‘शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रम तसेच ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत खरीप हंगाम पूर्वतयारी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब, खतांचा संतुलित वापर आणि मातीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कमी किंवा अतिवृष्टीच्या परिस्थितीतही पिकांचे संरक्षण करणारे बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी माती परीक्षणाचे महत्त्व विशद करताना शेतकऱ्यांनी जमिनीच्या गरजेनुसारच खतांचा वापर करावा, असे सांगितले. पहिल्या पावसानंतर तातडीने पेरणी न करता जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी व डॉ. शरद जाधव यांनी बीबीएफ यंत्राद्वारे पिक व खत पेरणी तसेच टोकण यंत्राद्वारे पेरणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. या तंत्रज्ञानामुळे बियाणे व खतांची बचत, ओलावा संवर्धन तसेच उत्पादनवाढीचे फायदे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवून देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत बीबीएफ यंत्राद्वारे सरी-वरंबा पद्धतीने पेरणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच महिला शेतकरी व शेतमजुरांचे श्रम कमी करण्यासाठी टोकण यंत्राचा प्रभावी वापर कसा करता येईल, याची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
बीबीएफ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून इतर शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रेरणा देणाऱ्या मनोज चौधरी (मुमराबाद), हितेंद्र महाजन (म्हसावद), राजेंद्र पाटील (पिचर्डे) व सुनील बोरसे (चोपडा) या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी, शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दीपक दहात, डॉ. सुमेरसिंग राजपूत, डॉ. गिरीश चौधरी, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) भरत इंगळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, दीपक साळुंखे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. शरद जाधव, किरण जाधव, तुषार गोरे, किरण मांडोळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, महिला शेतकरी व कृषी सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी दिनेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकल्प उपसंचालक (आत्मा) भरत इंगळे यांनी केले.






