मुंबई, 6 जून: तीव्र उकाडा आणि कडक उन्हाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनचे अखेर आज, 6 जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने संपूर्ण गोवा व्यापून दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागात जोरदार हजेरी लावली आहे.
मान्सून लवकरच राजधानी मुंबईसह राज्यात बरसणार –
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अनुकूल परिस्थितीमुळे मान्सूनचा वेग चांगला आहे. पुढील ४८ ते ७२ तासांत मान्सून मुंबईसह दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत 10 ते 12 जून दरम्यान मान्सूनचा मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.
केरळ किनारपट्टीवर पोहोचल्यानंतर मान्सूनची वेगाने वाटचाल –
यंदाचा नैऋत्य मान्सून केरळमध्ये नेहमीच्या तुलनेत तीन दिवस उशिराने दाखल झाला. ४ जून रोजी केरळ किनारपट्टीवर पोहोचल्यानंतर मान्सूनने वेगाने वाटचाल केली. अवघ्या दोन दिवसांत त्याने कर्नाटक, तामिळनाडू, गोवा तसेच अरबी समुद्रातील काही अतिरिक्त भाग व्यापत महाराष्ट्राच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या वातावरणीय परिस्थिती अनुकूल असून त्याची प्रगती कायम राहण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या आगमनाकडे होतं लक्ष –
एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक भागांनी तीव्र उष्णतेचा सामना केला. विशेषतः विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, काही ठिकाणी झालेल्या वादळी पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले होते. अशातच आता मान्सूनचे राज्यात आगमन झाले असून येत्या काही दिवसांत तो संपुर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग येण्यासह शेती क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बळीराजा सुखावला, पण पेरणीसाठी घाई नको –
मान्सून वेळेवर आल्यामुळे राज्यातील बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. परंतु, कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. केवळ पहिल्याच पावसात पेरणीची घाई करू नये. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होण्यासाठी किमान ७५ ते १०० मिमी पाऊस पडू द्यावा, त्यानंतरच अधिकृत पेरण्या कराव्यात, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही.






